ट्रेंडिंग
India Pakistan War : युद्धात फक्त पाकिस्तानचाच होईल विनाश, भारत सर्वार्थानं मजबूत; अमेरिकन एजन्सीचा दावा, अहवालात नेमकं काय?
Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीजचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे.
India Pakistan War : पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध अमेरिकन रेटिंग एजन्सी मूडीजचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. त्यात म्हटले आहे की जर भारत-पाकिस्तान तणाव आणखी वाढला तर त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय चलन साठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे, भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर दबाव
मूडीजच्या (Moody's) मते, जर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दीर्घकाळ राहिला तर पाकिस्तानचा विकास दर कमी होऊ शकतो आणि त्याच्या आर्थिक स्थिरतेवर परिणाम होईल. विशेषतः, पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर (Forex Reserves) दबाव वाढेल, जे येत्या काही वर्षांत परकीय कर्ज फेडण्यासाठी आधीच अपुरे मानले जात आहे.
भारतावर फारसा परिणाम होणार नाही
भारताबद्दल बोलताना मूडीजचे (Moody's) म्हणणे आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील आर्थिक संबंध खूपच मर्यादित आहेत. भारताच्या एकूण निर्यातीपैकी फक्त 0.5 टक्क्यांपेक्षा कमी निर्यात पाकिस्तानला जाते. त्यामुळे, तणाव वाढला असला तरी, भारताच्या आर्थिक घडामोडींमध्ये कोणताही मोठा धक्का बसण्याची शक्यता नाही. आर्थिक वर्ष 25 (FY25) (एप्रिल ते जानेवारी) च्या आकडेवारीनुसार, भारताने पाकिस्तानला 447.65 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. त्याच वेळी, पाकिस्तानमधून आयात फक्त 0.42 दशलक्ष डॉलर्स होती.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, ज्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या टीआरएफने घेतली होती. भारताने या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाच दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे, त्यापैकी तीन पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. यानंतरच दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. परिणामी आता हाच तनाव आणखीन शिगेला पोहचला आहे.
दरम्यान, या अहवालात पुढे म्हटले आहे की, जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर भारताला संरक्षण खर्च वाढवावा लागू शकतो, ज्यामुळे वित्तीय तूट वाढू शकते आणि वित्तीय सुधारणांचा वेग मंदावू शकतो. पण एकंदरीत, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहील.
इतर महत्वाच्या बातम्या