Akola Water Crisis : अकोल्यातील उगवा गावात दुष्काळाची दाहकता, पाण्याच्या टाक्यांना कुलूप लावून संरक्षण
Akola Water Crisis : कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून अकोल्यातील दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आला आहे. आता मायबाप सरकार काहीतरी उपाययोजना करेल हीच गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

अकोला : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवत असताना अकोल्यात मात्र अधिकच भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. जिल्ह्यातील उगवा गावात पाण्याला सोन्याचं मोल आल्याचं दिसतंय. याचं कारण म्हणजे गावात असलेली तीव्र पाणीटंचाई. नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी येतं. त्यामुळे गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. विकत घेतलेलं हे पाणी चोरीला जावू नये म्हणून गावातील प्रत्येक घरात पाण्याच्या टाक्यांना कुलूपं लावण्यात आली आहेत. कुलूपबंद पाण्याच्या माध्यमातून दुष्काळाचा एक अत्यंत भेसूर चेहरा समोर आल्याचं दिसतंय.
एखाद्या तिजोरीला कुलूप लावून ठेवावं तसं गावातील लोक पाण्याच्या टाकीला कुलूपं लावतात. कारण इथं सोन्यापेक्षा पाण्यालाच अधिक मोल आहे. पाण्याच्या टाकीला कुलूप लावणारं हे गाव आहे अकोला जिल्ह्यातलं उगवा. 15 हजार लोकसंख्येचं हे गाव सध्या पाणीटंचाईमुळे त्रस्त आहे.
महिनाभरानंतर नळाला पाणी येतं, तेसुद्धा अगदी थोडा वेळ. त्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. किमान 600 ते 700 रुपयांना छोटा टँकर मिळतो. त्यामुळे विकत घेतलेलं पाणी चोरी जाऊ नये म्हणून टाक्यांना कुलूपं लावली जातात.
पाणी पुरवठा योजना कुचकामी
या गावामध्ये पाणीपुरवठा योजना आल्या खऱ्या, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघात उगवा गाव येतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख हे तिथले आमदार आहेत. खारपान पट्ट्यातील 69 गावांसाठी 219 कोटींची योजना मंजूर झाली. पण नंतर योजनेला स्थगिती मिळाली. सध्या कार्यरत असलेली 84 खेडी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.
आरोप-प्रत्यारोप सुरू
अकोल्याच्या उगवा गावातील पाणीप्रश्न सोडवू न शकल्यानं ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांनी गावकऱ्यांची माफी मागितली. मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील 69 गावातील पाणीटंचाईला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला.
पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्याचं सरकारचं आश्वासन
'एबीपी माझा'ने अकोला जिल्ह्यातील उगवा गावातील पाणीटंचाईचं भीषण आणि दाहक वास्तव समोर आणल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. अजित पवारांनी यासंबंधी आमदार अमोल मिटकरीशी संवाद साधत पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान लवकरच उगवा गावासह जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार असल्याचं आमदार मिटकरी सांगितलंय.
कोरडेठाक पडलेले नळ... टाक्यांना लागलेली कुलूपं.. गावकऱ्यांचे पाणावलेले डोळे.. आणि व्यक्त होणारा संताप. हे सगळं काही सांगून जातोय. पाण्यासारख्या मुलभूत गोष्टीसाठी संघर्ष करणाऱ्या उगवा ग्रामस्थांची समस्या मायबाप सरकार समजून घेईल आणि उपाययोजना करेल हीच अपेक्षा.
ही बातमी वाचा: