आजी-माजी आमदारांच्या राजूर गावात काविळचे थैमान, 22 वर्षांच्या युवतीचा मृत्यू
Rajur Jaundice News : राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या मूळगावात गेल्या आठ दिवसांपासून काविळने थैमान घातला आहे. त्यामध्ये एका युवतीचा मृत्यू झाला.

अहिल्यानगर : जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात आजी-माजी आमदारांच्या राजूर गावात गेल्या आठ दिवसांपासून काविळ आजाराने थैमान (Rajur Jaundice News ) घातले आहे. त्यामध्ये उपचार सुरू असताना प्रियंका शेंडे या 22 वर्षीय तरूणीचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. काविळच्या आजाराने नागरिक धास्तावले असून आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे. दूषित पाण्यामुळे काविळीची साथ वाढल्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे (Kiran Lahamate) आणि भाजपचे माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांचा अकोले विधानसभा मतदारसंघ. अकोले तालुक्यातील राजूर गाव हे या दोन्ही आमदारांचं मूळगाव. याच गावात गेल्या आठ दिवसांपासून काविळ आजाराने थैमान घातले आहे.
दूषित पाण्यामुळे काविळची साथ
दूषीत पाण्यामुळे शेकडो नागरिक बाधित झाले असून शासकीय तसेच अनेक खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. प्रियंका शेंडे या 22 वर्षीय तरूणीचा उपचारादरम्यान रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. काविळच्या थैमानामुळे नागरिक धास्तावले असून सोमवारचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला आहे.
प्रशासनाने तातडीने पावले उचलून काविळचा फैलाव थांबवणे गरजेचे असल्याची मागणी माजी सरपंच बाळासाहेब देशमुख यांनी केली. तर दररोज नवीन रुग्ण दाखल होत असल्याची माहिती राजूर गावातील डॉक्टर घोडके यांनी दिली.
आरोग्य पथक गावात
दरम्यान, कावीळची साथ वाढल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येळेकर यांनी देखील या गावात जाऊन पाहणे केली. आरोग्य यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असून आरोग्य पथक देखील राजूर गावात तैनात करण्यात आलं आहे. आतापर्यंत शंभरच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. पाण्यामुळे हा आजार बळावला असल्याची शक्यता मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येळेकर यांनी व्यक्त केली असून योग्य त्या सूचना दिल्या आहेत
दरम्यान, पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या ठिकाणी विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयात देखील जाऊन त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. एकीकडे राज्यात केस गळतीचं प्रमाण वाढल्याच्या घटना समोर आल्या, तर नखं गळती देखील होत असल्याच समोर आलं. त्या पाठोपाठ आता राजूर गावात कावीळ साथीने थैमान घातले असून साथ रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
