Sharad Pawar-Ajit Pawar मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुण्यात 10 जूनला पक्षाचा वर्धापनदिन साजरा करणार आहेत. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमधे आणि पक्षातील नेत्यांमध्ये खरच दोन्ही पक्ष एक होणार का याबाबत संभ्रमाच वातावरण आहे. एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी अखंड राष्ट्रवादी पाहिला मिळणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एका गटाच म्हणणं असं आहे की, कदाचित पक्षांतर्गत फेरबदलाची घोषणा शरद पवार करू शकतात कारण मागील काही दिवसांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची संशयाची भूमिका आहे. सध्या केवळ सध्याचे पक्षाचे आमदार यांच्याशी जयंत पाटील संपर्क ठेऊन असून माजी आमदारांशी त्यांचा संपर्क नाही. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या तयारीत सक्रिय सहभाग नाही. शिवाय मागील दीड महिन्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या भेटी देखील संशयास्पद आहेत. दुसरीकडे पक्षातील दुसऱ्या गटाच म्हणणं असं आहे की सध्या तरी पक्षांतर्गत फेरबदल होणं शक्य नाही कारण मागील महिन्याच्या शेवटाला होणाऱ्या पक्षाच्या आमदार खासदार यांच्या बैठका अद्याप पार पडलेल्या नाहीत.


पक्षफुटी नंतर देखील अखंड राष्ट्रवादीसाठी दोन्ही पवारांच्या भेटीगाठी?


अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर जे अधिवेशन पार पडले त्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व मंत्री शरद पवारांना भेटायला वाय बी चव्हाण सेंटर येथे गेले होते. हे शरद पवारांची परवानगी घेऊनच भेटायला गेले होते. किंबहुना आम्ही सत्तेत सहभागी झाल्यानंतर उरलेली शरद पवारांची राष्ट्रवादी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमच्या सोबत येणार हाच निर्णय झाला होता अशीही माहिती पक्षातील वरिष्ठ नेते देतात. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत याविषयावर चर्चा केली असता सांगण्यात आलं की अजित पवारांनी आणि काही पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. याबाबत आम्हाला कल्पना होती मात्र आम्ही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. अधिवेशनाच्या शेवटी सर्व अजित पवारांचे नेते जाणीपूर्वक महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांनी महायुतीमधे जाण्याचा निर्णय हा शरद पवारांच्या आशिर्वादानेच घेतला आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वाय बी चव्हाण सेंटर येथे येत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या मंत्र्यांना शरद पवार भेटले देखील नाहीत कारण शरद पवारांना अजित पवारांचा एनडीए मधे सहभागी होण्याचा निर्णय आवडला नव्हता. त्यानंतर अचानक एके दिवशी पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठीच ही बैठक होती अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते सांगतात.


लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवीहवीशी शरद पवारांची राष्ट्रवादी आता का झाली नकोशी?


लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात इंडिया आघाडीची ताकद दिवसेंदिवस वाढत होती. या आघाडीला तोडायचं असेल तर एकट्या शरद पवारांना जरी बाजूला केलं तरी इंडिया आघाडी एका क्षणात दिशाहीन होईल असा विश्वास भाजप श्रेष्ठीना होता. कारण इंडिया आघाडीची मोट बांधण्याच काम एकट्या शरद पवारांनी केलं होतं. एकमेकांची तोंडं देखील न पाहणारे अनेक पक्ष केवळ शरद पवार या नावामुळे इंडिया आघाडीला जोडले गेले होते. त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे यांना लोकसभेऐवजी राज्यसभेसाठी विनंती करण्यात आली होती. यासोबतच दिल्लीतील सर्व राजकारण ताई राज्यातील सर्व राजकारण दादा असा जुनाच प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने लढण पसंद केलं त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना अपेक्षित यश मिळालं नाही मात्र अजित पवारांना अपेक्षा पेक्षा जास्त यश मिळाल. याचा परिणाम शरद पवारांसोबत राहिलेले आमदार अजित पवारांसोबत आपण जायला हव यासाठी शरद पवारांना गळ घालताना पाहिला मिळाले तर खासदारांनी आपण अजित पवारांसोबत जाण्यापेक्षा एनडीएचा घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी होऊ अशी विनंती शरद पवारांकडे केली.


एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार सध्या पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीलासोबत घेण्यासाठी विरोध आहे. जर शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांकडे विलीन झाली तर सध्याच्या लोकसभेच्या संख्याबळानुसार सुप्रिया सुळे यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडू शकते. त्यामुळे अजित पवारांकडून इच्छुक एका वरिष्ठ नेत्याचा केंद्रीय कॅबिनेट पदाचा पत्ता कट होऊ शकतो. दुसऱ्या नेत्याचा विरोध आहे कारण जयंत पाटील राष्ट्रवादीत आले तर आपोआपच एक तर मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्षपद त्यांना द्यावं लागेल. मंत्रिपद देण्यासाठी सध्या पक्षातील आमदारांचा जयंत पाटलाना विरोध आहे. राहता राहीला प्रदेशाध्यक्षपदाचा तर सध्या त्या पदावर सुनील तटकरे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नाही. एकंदरीत सध्याची दोन्ही पक्षातील ही परिस्थिती पाहता याक्षणी तरी अखंड राष्ट्रवादी होण्याची शक्यता दिसत नाही. शेवटी जाता जाता इतकंच सांगता येईल अजित पवार हे त्यांच्या पक्षातील सर्वेसर्वा आहेत तर शरद पवार हे त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. जर दोन्ही पवारांनी ठरवलचं असेल तर अखंड राष्ट्रवादी होण्याला कोणीच रोखू शकत नाही.


संबंधित बातमी:


MNS Shivsena UBT : जोरात बोलुया, शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि मनसेच्या नेत्यांची दादरमधील एका लग्न समारंभात भेट